धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्व उमेदवार व्यस्त असताना, निवडणूक विभागाच्या कामकाजातील एक गंभीर त्रुटी समोर आली आहे. जिल्ह्यातील मतदान केंद्रावर अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्यांमध्ये काही अशा व्यक्तींचा समावेश आहे, ज्यांचा निवडणुकीच्या प्रक्रियेशी दूरदूरचा संबंध नाही. अशाच एका प्रकरणात, जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यात महिंद्रा पिकअप वाहन चालवणाऱ्या तानाजी तुपे यांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
तानाजी तुपे, हे लातूर येथील स्टोअर रूममधून औषधं व गोळ्या आणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पोहोचवतात. त्यांचे शिक्षण कमी असून, निवडणुकीसंबंधी कोणताही अनुभव नाही. तरीही, त्यांना परंडा येथे मतदान अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण घेण्याची सक्ती करण्यात आली आहे.
तानाजी यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त करत सांगितले की, "मी अडाणी माणूस आहे, निवडणुकीत मला काही कळत नाही, पण साहेबांनी इलेक्शन ड्युटीचा आदेश दिला आहे." तुपे यांच्यासारखे आणखी काही ड्रायव्हर देखील मतदान अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत, ज्यामुळे निवडणूक विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निवडणूक विभागाच्या या निर्णयावर टीका होत असून, "फक्त बोटावर शाई लावायची आहे, त्यास शिक्षणाची गरज काय?" या निवडणूक अधिकाऱ्यांच्या विधानामुळे ही बाब अधिक गाजत आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेत गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS